सातारा : सध्या संपूर्ण देशामध्ये धर्मांधतेचे वातावरण पसरवण्याचे काम सत्ताधार्यांकडून जाणीवपूर्वक केले जात आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरीमध्ये हजारो भाविक मृत्युमुखी पडले आणि तितकेच बेपत्ता झाले असावेत. पण शासन खरा आकडा जाहीर करत नाही आणि खरे आकडे समोर येऊ देत नाही. शासनाची व एकूणच प्रशासनाची यासंदर्भात बेपर्वाई दिसून येते. याप्रकरणी जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी केली.
कोल्हापूरला जाताना शुक्रवारी सकाळी डॉ. बाबा आढाव हे रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार व ओंकार मोरे यांच्यासह सातारा येथे आले असताना ते बोलत होते. सातार्यातील फुले- शाहू - आंबेडकरवादी, परिवर्तनवादी कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबा आढाव यांनी सध्याच्या राजकीय व सामाजिक स्थितीबद्दल माहिती घेतली. त्यावेळी डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले की महाकुंभमेळा आणि तेथील चेंगराचेंगरीमध्ये बेपत्ता झालेले व मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लक्षात घेता सरकारचा हलगर्जीपणा यात दिसून येतो. त्यामुळे सरकारने जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे.
सध्याची देशातील सामाजिक परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. या संदर्भात तरुणाईनेच आता उचल खाल्ली पाहिजे. आता निर्भय बनून रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही असेही डॉ बाबा आढाव म्हणाले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी प्रास्तविक केले. यावेळी जयंत उथळे, मिनाज सय्यद, अरिफभाई बागवान, सुदामराव आवडे, शिरीष जंगम, दिलिप ससाणे, नारायण जावळीकर, प्रा. संजीव बोंडे, डॉ. राजश्री देशपांडे, नीलिमा देशपांडे उपस्थित होते.