सातारा : सातारा जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ना. शंभूराज देसाई आणि ना. मकरंद पाटील या दोन्ही मंत्र्यांंना आश्वस्त केले आहे. ते निश्चितपणे दोघांनाही न्याय मिळवून देतील, असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ना. सामंत म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या घटनेनंतर तेथील पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्या निलंबनाची तसेच बडतर्फीची मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्री व आमदारांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर पीठासन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एसपींच्या निलंबनाचा निर्णय दिला तर नंतर सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिलेला निर्णय दुसरा आहे.
या प्रकारावरुन फार मोठी संभ्रमावस्था झालेली होती. याबाबत विधीमंडळात सदस्यांनी हा संभ्रम दूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सभापती व उपसभापती यांनी दिलेल्या निर्णयासंदर्भात संविधानाचे तज्ञ, कायद्याचा अभ्यास असलेल्या तज्ञांकडे हे प्रकरण पाठवून घेण्यात येणार आहे. ना. शंभूराज देसाई आणि ना. मकरंद पाटील यांनी विधीमंडळामध्ये योग्य प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत मुख्यमंत्री कडक कारवाई करतील, यात आम्हाला शंका नाही. शिवसेना कुठल्याही कोंडीत नाही, असेही स्पष्टीकरण ना. सामंत यांनी यावेळी केले.