सातारा

सातारा : गिरणी कामगारांची वारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

मोहन कारंडे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्यातीत 1 लाख 75 हजार गिरणी कामगार अद्यापही घराच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जवळपास 20 हजार पेक्षा जास्त गिरणी कामगार आहेत. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच गिरणी कामगारांना घरे देण्यात आलेले आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज सातारा येथे गिरणी कामगार व गिरणी कामगारांच्या वारसांनी सरकारता जागे करण्यासाठी पंढरपुरला न जाता शासन दरबारी आपली दिंडी वळवली.

येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधत सरकारला जागे करण्यासाठी सदरील मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे अध्यक्ष तेजस कुंभार, विठ्ठल चव्हाण, दिलिप सावंत, अर्जुन भादवणकर यांनी दिली. एका गिरणी कामगाराला मुंबईमध्ये घर तर दुसऱ्या गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेर घर ही सरकारची दुटप्पी भूमिका गिरणी कामगारांच्या वारसांना तथापी मान्य नाही. सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर गिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील तसेच संपूर्ण राज्यातीत गिरणी कामगार आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असे तेजस कुंभार यांनी सांगितले. तसेच काँग्रेसच्या काळातील 2001 मध्ये झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सरकारने तत्काळ लागू करावी. मिलच्या जागेवरती जो काही रोजगार उपलब्ध होईल त्या रोजगारांमधील प्रथम प्राधान्य हे गिरणी कामगारांच्या वारसांना मिळेल, अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे. मात्र मिलच्या जागेवरती जे काही रोजगार आज उपलब्ध आहेत त्या ठिकाणी परप्रांतीयांना प्राधान्य देण्यात आले आहे, असा आरोप अध्यक्ष तेजस कुंभार यांनी केला.

राज्यात सुरू असलेल्या काही नोकर भरतीत गिरणी कामगारांच्या मुलांना किमान पाच टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी देखील तरुण स्वराज्य सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात प्रत्येक गिरणी कामगारांच्या घरावर इथे गिरणी कामगार राहतात असे फलक पाहायला मिळणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी याकडे कितपत लक्ष देऊन गिरणी कामगारांना न्याय मिळवून देतात हे पाहणे महत्वाचे आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये गिरणी कामगारांना घर नाही तर तुमच्या पक्षाला मतदान नाही, अशा प्रकारची भूमिका गिरणी कामगारांनी आज घेतली. सदरीत मेळाव्याचे आयोजन गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे सातारा जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चव्हाण दीलीप सावंत यांनी केले होते. या मोर्चामध्ये गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री तेजस कुंभार, अर्जुन भादवणकर, विशाल कुंभार, सागर पिसाळ, अभिजीत शेलार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT