म्हसवड : म्हसवड शहरात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी स्टँड परिसर व शिंगणापूर चौकाला पाण्याने वेडा दिल्याने व्यापारी वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने रविवारी या परिसरातील अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात हातोडा मारत अनधिकृत बांधकामे व टपर्या हटवल्या.
शनिवारी म्हसवड शहराला पावसाचा मोठा तडाका बसला. एसटी स्टँड परिसर, शिंगणापूर चौक या भागाला महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पाण्याने या भागातील सर्व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या-ज्या वेळी मोठा पाऊस पडतो त्यावेळी नेहमीच व्यापारी लोकांचे नुकसान होतेे. शनिवारीही असाच मोठा पाऊस होऊन व्यापार्यांच्या दुकानात पाणी शिरुन नुकसान झाल्याने नगरपालिकेने रविवारी सकाळी आठ वाजता डीवायएसपी रणजित सावंत, अप्पर तहसीलदार मीना बाबर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि अक्षय सोनवणे यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस फौजफाट्यासह स्टॅन्ड परिसर व शिंगणापूर चौकातील दुतर्फा बाजूने गटरावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे गाळे, टपर्या जेसीबीच्या साह्याने काढण्याचे काम रविवारी दिवसभर चालू होते.
रविवारी सकाळी सुरुवातीला श्रीरुद्र स्वीट मार्ट या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करून वीरकर हार्डवेअरसह एसटी स्टँड परिसर ते चांदणी चौक या बाजूचे ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणे आहे ती ती नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी काढून टाकली. तसेच दुसर्या बाजूकडील सचिन टी हाऊस, रत्नदीप स्वीट्स ते नाना ढाबापर्यंत गटरी वरील अतिक्रमणे काढून टाकून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
काही जण ही कारवाई योग्य असून यापूर्वीच ही कारवाई करणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करत आहेत. तर काही नागरिक ही कारवाई करण्याच्या अगोदर व्यावसायिकांना नोटिसा देण्याची गरज होती, असे मत व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी शहरातील गटारावर नागरिकांनी बांधकामे केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवत असून या पुढील काळात नगरपालिकेने अशा बांधकाम करणार्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी, मागणी जनतेतून जोर धरु लागली आहे.