कराड : यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे. कोपर्डी लिंक कॅनॉल चालू झाल्यापासून मसूर पूर्व भागाला कधीही पाणी कमी पडलेले नाही. परंतु यावर्षी जास्त प्रमाणात उन्हाची दाहकता व तारळी धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पाण्यासाठी अडचण होत आहे. परंतु, मसूरपुर्व भागाला सात तारखेला आरफळ कॅनॉलमधून कण्हेर धरणाचे पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
तारळी धरणाचे लिकेज काढण्याचे व आरफळ कालवा लायनींग करून पाणी गळती कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून आमदार मनोजदादा घोरपडे यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत.
मसूर पूर्व भागाचा दुष्काळ मिटवण्यासाठी हणबरवाडी धनगरवाडी ही महत्वकांक्षी उपसा सिंचन योजना कार्याविनित केली असून त्याला कोपर्डी लिंक कॅनॉलच्या माध्यमातून तारळी धरणाचे पाणी घेण्यात येत आहे. परंतु चालू वर्षी सर्व ठिकाणाहून पाण्याची मागणी असून एकाच वेळी सर्वांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पाण्याच्या रोटेशनमध्ये थोडासा विलंब होत आहे. यातून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता आमदार मनोजदादा घोरपडे हे सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त पाणी कसे देता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत.
लोड शेडिंगपासून शेतकऱ्यांची सुटका होणार...
शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून 90 नवीन डीपी बसवण्याचे काम चालू झालेले आहे. ज्या ठिकाणी 65 चे डीपी आहे तिथे 100 चे डीपी बसवून ज्या ठिकाणी 100 चा आहे त्या ठिकाणी अतिरिक्त 100 बसवल्यामुळे वारंवार डीपी जळणे, फ्युज उडणे, लोड शेडिंग यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.