वाई : विधानसभा निवडणुकीत पश्चिम भागाने साडेतेरा हजार मतांची आघाडी दिली होती. या भागातील जनतेने जे मागितले ते पूर्ण केले. या भागाच्या विकासात योगदान नसलेल्या बोलघेवड्यांनी नुसत्या रावणाच्या गप्पा मारण्यापेक्षा किमान आपल्या गावातील रस्त्यांवरील खड्डे तरी बुजवावेत, अशी खोचक टीका मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केली.
चिखली सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, प्रतापराव पवार, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी संजय मांढरे, युवानेते बाजीराव वाडकर, चंद्रकांत शेलार, चेअरमन बाळासाहेब वाडकर, व्हाइस चेअरमन अनिता शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, पश्चिम भागातील प्रेमळ माणसे विरोधकांच्या भुलभुलैयाला बळी पडल्याचे आश्चर्य वाटते. या भागाच्या विकासासाठी आपण सातत्याने काम केले असून पश्चिम भागातील जललक्ष्मी योजना टप्पा-2 देखील आपणच पूर्ण करणार आहे. विरोधकांनी आपला आवाका आणि कुवत ओळखून विकासाच्या गप्पा माराव्यात. बापूसाहेब शिंदे यांनी संस्थेत आर्थिक शिस्त रुजवली असून नगदी पीक नसतानाही चिखली सोसायटीची प्रगती आदर्शवत असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.
बापूसाहेब शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीत बाळासाहेब चिरगुटे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मला निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यांच्यामुळेच मी 80 व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो. बाळासाहेबांचा त्याग शिंदे कुटुंब कधीही विसरणार नाही आणि आमचे राजकीय वारसदार बाळासाहेब चिरगुटेच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.