सातारा : जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण कदापि सहन करणार नाही. प्रचंड पैसा व प्रशासकीय बळाचा वापर करून केलेल्या या प्रयोगाचा जाहीर निषेध आहे. पक्षाचा शिस्तभंग करणाऱ्या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांनी आज आमचे सदस्य फोडले असले तरी त्यांच्यावरही ती वेळ येणार आहे. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही. माझे कुटुंब 50-60 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात आहे. या घटनेचे शंभर टक्के प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
हॉटेल प्रिती एक्झिक्युटिव्ह येथे शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी खा. नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, संजीवराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब सोळस्कर, अनिल देसाई, संजय देसाई, सुरेंद्र गुदगे आदि प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
झेडपी सदस्य कामेश कांबळे यांच्या गैरहजेरीबाबत विचारले असता ना. मकरंद पाटील म्हणाले, कामेश कांबळे हे गैरहजर होते. त्यांच्या भूमिकेवर सर्वजण संदिग्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत तसेच जिल्ह्यात तुमच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने उभी राहिली नाही, याकडे लक्ष वेधले असता ना. मकरंद पाटील म्हणाले, याबाबतच्या चर्चा चुकीच्या आहेत. झेडपीबाबत घडलेल्या घटनांची माहिती पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात ंआली असल्याचे ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.