दहिवडी : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ऐतिहासिक महिमानगड किल्ल्याला अखेर शासनमान्यता मिळाली असून किल्ला असलेले गट क्रमांक 372, 373 व 539 हे अधिकृत मोजणी नकाशावर ‘किल्ला’ असा स्पष्ट उल्लेख करुन नोंदवण्यात आले आहेत. भूमिअभिलेख विभागामार्फत किल्ल्याची मोजणी पूर्ण करण्यात आली असून किल्ल्याच्या हद्दीची रेषाही अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली किल्ल्याच्या स्वतंत्र ओळखीची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
महिमानगड किल्ला शासनाच्या नोंदीत स्वतंत्रपणे दिसावा यासाठी अमोल एकळ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांनी माण तालुक्याचे तहसिलदार विकास आहीर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली होती. या मागणीची दखल घेत तहसिलदार आहीर यांनी माण तालुका भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक धनंजय कदम यांना संबंधित गटांची अधिकृत मोजणी करण्याचे आदेश दिले. यानंतर भूमिअभिलेख विभागाने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष मोजणी केली.
मोजणीदरम्यान मोजणी अधिकारी यांनी मोजणी प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी अमोल एकळ, महसूल सहाय्यक अशोक अवघडे, सुरेश कुचेकर, दत्तात्रय धडांबे (माजी सैनिक), नंदकुमार कुचेकर, बाळू गोसावी, मानसिंग धडांबे, रोहिदास कुचेकर, अमोल कदम, मोहन तोडकर, राजू मुलानी, नंदकुमार धडांबे, रोहिदास धडांबे, बिणू मुलानी, सतीश धडांबे, चंद्रकांत जाधव, विश्वनाथ जाधव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारीही उपस्थित होते.