बामणोली : राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरची समीकरणे वेगळी होती. असे असले तरी झेडपीमध्ये महायुतीच सत्ता स्थापन करेल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या आपल्या गावी ते माध्यमांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या सगळीकडच्या वेगवेगळ्या समीकरणांनुसार झालेल्या आहेत. राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये देखील महायुतीलाच विजय मिळाला आहे. महायुतीलाच लोकांनी कौल दिला आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरची समीकरणे आहेत त्याप्रमाणे महायुतीच जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल.
शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दुसऱ्या देशातील राष्ट्राध्यक्ष भारतात येऊन आपल्या सोबत करार करताना पाहायला मिळतात. अशी विदेशी गुंतवणूक यापूर्वी आपल्या देशात कधी झाली नव्हती. याच्यातूनच काँग्रेसचा जळफळाट दिसून येत आहे. म्हणूनच त्यांचे माकड चाळे सुरू आहेत. समेटमध्ये अशा प्रकारचं अर्धनग्न आंदोलन करून काँग्रेसची अब्रू वेशीला टांगली आहे. परंतु त्यामुळे या देशाची बदनामी देखील होत आहे. जगभरातील अनेक देशातील प्रमुख आले होते त्यांच्यासमोर काँग्रेसने देशाची बदनामी केली आहे. समेटचा जो कार्यक्रम होत आहे त्याला गालबोट लावण्यासाठी केलेला हा काँग्रेसचा केविलवाना प्रयत्न होता, अशी टिका ना. एकनाथ शिंदे यांनी केली.