सातारा

गौतम अदानींबाबत पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे : पृथ्वीराज चव्हाण

दिनेश चोरगे

कराड; पुढारी वृत्तसेवा : अदानींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे अदानींबाबत पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे, असे सांगत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार व अदानी यांच्या भेटीबाबत मी काहीही बोलू शकत नाही, असे सांगितले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची गौतम अदानी यांनी भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे दोन तास प्रदीर्घ चर्चा झाली. याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता कोण कुणाला भेटले याबाबत मी काय बोलणार? त्यांचे जुने संबंध असून सहकार्य घेण्यासाठी ते भेटले असतील. त्याबाबत मी काही बोलू शकणार नाही. अदानींबाबतचे आमचे प्रश्न कायम आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे अदानींनी नाही तर पंतप्रधानांनी दिली पाहिजेत. कारण आरोप त्यांच्यावर झाले आहेत. राहुल गांधी व केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांची उत्तरे त्यांनाच द्यावी लागतील. पैसे कोणाचे याबाबत काहीही उत्तर आले नाही. आत्ता सांगितले जाते की कंपन्या विकून मी पैसे गोळा केले आहेत. मग बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात पैसे का गुंतवले? भारतात का गुंतवले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो.

ज्याच्यावर गंभीर आरोप आहे तो त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणालाही भेटू शकतो. त्यामध्ये वावगे मानण्याचे काही कारण नाही. कुठून तरी आपल्याला मदत व्हावी म्हणून तो प्रयत्न करत असतो. वीस हजार कोटी कोणाचे आहेत? याबाबत प्रधानमंत्र्यांवर थेट आरोप झाले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरेही त्यांना द्यावी लागतील. ते शरद पवार किंवा अदानी हे देऊ शकणार नाहीत. प्रश्न भटकवण्यासाठी इतर गोष्टी सुरू आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कोण कुणाला भेटलं याबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते सुरू असलेल्या सर्व प्रकार बघते आहे. त्यामुळे यावर महाराष्ट्रातील जनता जो काही निष्कर्ष काढायचा असेल तो काढेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT