महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव दि. 2 ते 4 मे या कालावधीत होणार आहे. या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार असून कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, अजित पाटील, सोनाली मेटकरी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, उत्सव कालावधीत पर्यटकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता पोलिस विभागांनी घ्यावी. महाबळेश्वरला येण्यासाठी वाई, सातारा कोकणातून रस्ते आहेत. या रस्त्यांवरील कामे व महाबळेश्वर अंतर्गत रस्त्यांची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत. त्याचबरोबर महाबळेश्वर शहर सुशोभीकरण करावे. या उत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून प्रसिद्धी द्यावी. या उत्सवामध्ये स्थानिक व्यावसायिकांचाही सहभाग घ्यावा. ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्या ठिकाणाहून पोहोचण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात यावी. या बस मधून पर्यटकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोच करावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकारी कर्मचार्यांची नियुक्ती करावी.
याशनी नागराजन म्हणाल्या, उत्सव कालावधीमध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री होण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावे. संस्थेने एकाच कार्यक्रमावर लक्ष केंद्रित न करता विविध कार्यक्रम दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे.
समीर शेख म्हणाले, उत्सव कालावधीत गर्दी होणार नाही व वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता पोलिस विभागाकडून घेतली जाईल. घाटातील ज्या ठिकाणी कठडे तुटले आहेत, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कटडे दुरुस्त करावेत. वाहने बंद पडल्यास ते हलवण्यासाठी क्रेनची व्यवस्था ही केली जाईल. तसेच उत्सव काळात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत त्याची माहिती असणारे माहितीपत्र छापावेत व त्यावर क्यूआर कोडचा वापर करावा, अशा सूचना उत्सवाचे काम करणार्या संस्थेला केल्या.
येणार्या पर्यटकांच्या आरोग्याच्यादृष्टीने आराखडा तयार करावा. महापर्यटन उत्सवाचे काम ज्या संस्थेला दिले आहे त्या संस्थेशी समन्वय साधून विविध विभागांनी उत्सवासंदर्भातील कामे पूर्ण करावी. संस्थेने विविध प्रकारच्या ऐतिहासिक थीमचा वापर करून कार्यक्रमाच्या ठिकाणचे प्रवेशद्वार तयार करावे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्थानिकांचा सहभाग घ्यावा. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन पॉईंटचे पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे. त्याचबरोबर कृषी विभागाने उत्सव काळात तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिल्या.