पाटण : कोयना धरणातील पाण्याअभावी या नूतन जलवर्षात सिंचनासह जलविद्युत निर्मितीलाही सर्वाधिक फटका बसला आहे. प्रामुख्याने सिंचन हाच मुख्य उद्देश असलेल्या याच धरणात निर्मितीनंतर पहिल्यांदाच सिंचनासाठी पाणी बंद करण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आल्यानं त्याकाळात केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच गरजेनुसार पाणी सोडण्यात आले. पश्चिमेकडील जलविद्युत निर्मिती अद्यापही पाण्याअभावी तुरळक प्रमाणात सुरू आहे.
गतवर्षी १५ जुलैअखेर ७.२५ टीएमसी पाण्यावर २०७.६०७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावर्षी पूर्व, पश्चिम या दोन्ही प्रकल्पासाठी अत्यल्प असा २.७६ टीएमसी पाणीसाठा वापरून केवळ ७३.९८० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
या जल वर्षांत आत्तापर्यंतच्या दिड महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे १.४५ टीएमसी पाण्यावर ७०.२९४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी ४.२० टीएमसी वर १९४.११८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे २.७५ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने १२३.८२४ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.
पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी आत्तापर्यंत सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात आले व १.३१ टीएमसी पाण्यावर ३.६८६ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
गतवर्षी लवकरच पाऊस सुरू झाल्याने सिंचनासाठी त्या काळात पाणी सोडण्यात आले नव्हते परंतु पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सोडलेल्या ३.०५ टीएमसी पाण्यावर १३.४८९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी १.७४ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने ९.८०३ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. अद्याप अपेक्षित पाऊस सुरू नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे.