रेठरे बुद्रुक : कृष्णा कारखान्याने यंदाच्या हंगामात कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करून, 14 लाख 19 हजार 308 मे. टन ऊसाचे कारखान्याच्या इतिहासातील विक्रमी गाळप साध्य केले आहे. शेतकऱ्यांनी कृष्णा कारखान्यास प्राधान्य दिले, ही कारखान्याच्या विश्वासार्ह व पारदर्शक कामकाजाची पोचपावती आहे. उत्पादनवाढ, आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याची सर्वांगीण प्रगती झाली सुरू आहे. चालू हंगामात कृष्णाने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला असून पुढील काळात कृष्णा राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कृष्णा कारखान्याच्या 66 व्या गळीत हंगामाची सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. अतुलबाबा भोसले, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, वसंतराव शिंदे निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, पंचायत समिती पै. धनंजय पाटील, प्रमोद पाटील, वैभव जाखले, डॉ. विजय कणसे, बालाजी पबसेटवार, दादासाहेब शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ.सुरेश भोसले म्हणाले, यावर्षी शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्याच सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. कारखान्याचा तोडणी वाहतूक खर्चाचा एकही रुपया बुडाला नाही. तसेच आर्थिक शिस्त राखल्याने, वेळेत बिल देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण झाली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही प्रगती शक्य झाली आहे.
बाजीराव सुतार म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सन 2025- 26 च्या गळीत हंगामात 14 लाख 19 हजार 306 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रत्येक सभासद, कामगार, अधिकारी व ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेच्या परिश्रमांची साक्ष आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि शेतकरी व कारखाना समन्वय यामुळे यंदाचा हंगाम समाधानकारक ठरला. ऊस वाहतूक, गाळप प्रक्रिया आणि वेळेत देयक अदा करण्यावर व्यवस्थापनाने विशेष भर दिला असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रारंभी संचालक अविनाश खरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शारदाताई खरात यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा झाली. यावेळी गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या ऊसतोडणी वाहतूकदार, प्रमुख अधिकारी, शेती विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ. विजय कणसे, डॉ. सचिन पवार, तसेच स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवल्याबद्दल गोंदीचे आरती पवार, प्रथमेश पवार, जीवन पवार यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वसंतराव साळुंखे, विनायक धर्मे, सरपंच हणमंत सूर्यवंशी, मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, किशोर पवार, गणेश पाटील, अधिकराव सोमदे, शेतकरी सभासद यांची उपस्थिती होती. बाबासो शिंदे यांनी आभार मानले.