सातारा : सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीसह कृष्णा नदीपात्र जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात व्यापली आहे. त्यामुळे नदीच्या प्रदुषणात गंभीर वाढ झाली आहे. दूषित पाणी, नायट्रेट-फॉस्फेटचे प्रमाण आणि सूर्यप्रकाशामुळे ही वनस्पती वेगाने पसरत आहे. ज्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला जावून जलचरांना धोका निर्माण झाला आहे.
कृष्णा नदीकाठची गावे तसेच प्रमुख शहरांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदुषित होवून त्यामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाई, सातारा आणि कराड परिसरात कृष्णानदीत जलपर्णीची बेटे तयार झाली आहेत. मुळात प्रदूषित पाण्यातच जलपर्णी मोठ्या प्रमाणात उगवते. धोम धरणापासूनच कृष्णा नदीत जलपर्णी वनस्पतीचा विळखा वाढू लागला आहे. नदीपात्र जलपर्णी वनस्पतीने व्यापले आहे. त्यामुळे पाणी कोठून वाहत आहे हे कळेनासे झाले आहे. वाढत्या जलपर्णी वनस्पतीमुळे नदी स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
साताऱ्यातील वेण्णा आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर क्षेत्रमाहुली व संगम माहुली ही दोन गावे वसली आहेत. या परिसराला ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक येत असतात. तसेच नदीपात्रात व परिसरात टाकण्यात येणारे निर्माल्य व कचऱ्यामुळे नदीच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. अस्वच्छतेमुळे भाविक व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, शासनाने याबाबत कृष्णा नदी स्वच्छता मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.