कोरेगाव : ल्हासुर्णे येथील धोम कॅनालच्या मयनर क्रमांक 12 परिसरातील बाळासाहेब शिंदे यांच्या वस्तीवर बुधवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सध्या या भागातील सिंगल फेज वीजपुरवठा दररोज रात्री दहा वाजेपर्यंत बंद राहत असल्याने शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
ल्हासुर्णेसह सुमारे 15 गावांतील अनेक शेतकरी आपल्या पाळीव जनावरांसह शेतातच वास्तव्यास आहेत. या शेतकऱ्यांना मिळणारी घरगुती वीज ही शेतीपंपाच्या फिडरवरून पुरवली जाते. मात्र सध्या सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वीजपुरवठा बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्यामुळे स्वयंपाक, जनावरांची देखभाल, मुलांचे शिक्षण तसेच उकाड्याच्या वातावरणात साधा पंखाही वापरता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
अंधारामुळे रानटी प्राण्यांचा धोका वाढला असून बिबट्याच्या दर्शनानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःच्या तसेच पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतात राहणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी अखंड घरगुती वीजपुरवठा उपलब्ध करुन द्यावा, तसेच सायंकाळी बंद होणारी सिंगल फेज लाईट तात्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. महावितरण कंपनीने या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.