बैठकीत निर्देश देताना अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, शेजारी नागेश पाटील, राहुल प्रकाश बर्गे, राजाभाऊ बर्गे, दिपाली बर्गे व पदाधिकारी. pudhari photo
सातारा

Koregaon highway bridge work : कोरेगाव महामार्गावरील पुलांची कामे सुरू करा

मल्लिकार्जुन माने; पदाधिकारी व प्रशासनात खंडाजंगी

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वसना नदी पात्रावर ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन उंच पूल उभारावा. या पुलाचे काम तातडीने सुरू करावे. शहरातील रखडलेली कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना केल्या.

सातारा-लातूर महामार्गाच्या कोरेगावमधील प्रलंबित कामांविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दिपाली बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन बर्गे, नितीन ओसवाल, नगरसेवक सागर विरकर, संतोष नलावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रस्ते विकास महामंडळाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनी मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या दिरंगाईमुळे कामे रखडली आहेत. या कंपनीकडून काम काढून घ्यावे, यासाठी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला आहे. प्रत्यक्षात किती काम झाले आणि किती अपूर्ण आहे, याबाबत माहिती देता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. यावर कंपनीच्या अधिकार्‍यांनी 15 दिवसात काम सुरू करणार असल्याचा शब्द दिला. यावर राहूल बर्गे यांनी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनीने चुकीची माहिती प्रशासनाला देऊ नये. कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक शहराच्या प्रवेशद्वारावर ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारण्याची मागणी आ. महेश शिंदे यांनी यापूर्वीच केली आहे.

0.75 मीटरने पुलाची उंची वाढवून काहीही होणार नाही, नव्याने डिझाईन तयार करून पुलाची उंची रेल्वेच्या पुलाएवढी करणे आवश्यक आहे. त्यातून महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे सांगितले. तसेच नवीन झाडे न लावल्याबाबतही बर्गे यांनी लक्ष वेधले. यावर कार्यकारी अभियंत्यांनी कंपनीने झाडे लावली होती मात्र शेतकर्‍यांनी काढल्याचा अहवाल दिल्याचे सांगितले. त्यावर बर्गे यांनी झाडे लावली नाहीत तर शेतकरी काढणार कोठून? असा सवाल केला.

महेश बर्गे यांनी ठेकेदार कंपनीने पोट ठेकेदार नेमल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असल्याचा आरोप केला. ठेकेदार कंपनीमुळे अनेक अपघात झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.

आ. महेश शिंदे घेणार ना. गडकरींची भेट

जिल्हा प्रशासनाच्या बैठकतून फलनिष्पत्ती बर्‍यापैकी झाली असली तरी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी अपेक्षित काम गतीने पूर्ण करू शकत नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. आ.महेश शिंदे यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या असून ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोरेगाव शहरातील रेल्वे स्टेशन नजीकच्या पुलाची उंची वाढवण्याबाबत ते मागणी करणार असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT