कोडोली : कोडोली जिल्हा परिषद गट हा माझ्यासाठी केवळ एक निवडणूक नाही, तर तो माझ्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे. या गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निता बाळासाहेब खरात यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदारांनी विकासाला गती द्यावी, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
कोडोली गटातील प्रचार सांगताप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे कोडोली गटातील उमेदवार सौ.निता बाळासाहेब खरात, कोडोली गणाचे उमेदवार रामदास साळुंखे व संभाजीनगर गणाचे उमेदवार विजया सागर साळुंखे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. खा.उदयनराजे म्हणाले, कोडोली गटाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून, या भागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य या सर्व क्षेत्रांत भरीव कामे करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी सक्षम, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक आहे, आणि ते नेतृत्व निता खरात यांच्या रूपाने या गटाला मिळणार आहे.
ते म्हणाले, भाजपच्या माध्यमातून कोडोली गटात विकासाची नवी पहाट उगवेल. कोडोलीचा विकास हाच माझा शब्द आहे आणि तो पूर्ण करून दाखवणारच. ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे यांचाही या गटाच्या विकासाला हातभार लागत आहे. त्यांच्या माध्यमातून भाजप -शिवसेना युतीचे काम लोकाभिमुख सुरू आहे. कोडोली जिल्हा परिषद गटाला सौ. निता खरात यांच्या रूपाने मितभाषी, सुशिक्षीत व सुसंस्कृत नेतृत्व लाभले आहे. त्यांचे पती बाळासाहेब हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना या गटातील जनतेच्या समस्यांची व अडीअडचणींची जाण आहे. त्यांचा सर्व गावात संपर्कही आहे. त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहे. त्यामुळे या सुसंस्कृत नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून कोडोली गटाचा सर्वांगीण विकास करा.
बाळासाहेब खरात म्हणाले, कोडोली गटातील जनतेच्या विकासाची आमची बांधिलकी आहे. खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रराजे व आ. महेश शिंदे यांच्या समन्वयातून कोडोली गटातील गावागावात विकास कामांचा झंझावात सुरु आहे. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, काँक्रीटचे रस्ते, बंदिस्त गटारे, पाणंद रस्ते, शेतीसाठी सिंचन, लाडकी बहिण योजना अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजना अधिक गतिमान करण्यासाठी व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निता खरात यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा.
निता खरात म्हणाल्या, कोडोली गटासाठी मी जीवतोड मेहनत घेणार आहे. राज्यात व देशात भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षाकडूनच विकास कामांना निधी दिला जातो. त्यामुळे या गटाचा विकास भाजपच करु शकते. कोडोली गटाचा समतोल विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध करून आणणार आहे.