कराड : कराड विभागात उष्णतेची लाट तीव्र होत असून तापमाना 40 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यातच तापमानात झालेली ही झपाट्याने वाढ नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरूवारी दुपारी 39 ते 40 अंश तापमान नोंदले गेले होते. आजचे कमाल तापमान 40 अंशावर गेल्याने चिंता वाढली आहे. दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे कराड शहरासह ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्णतेचा प्रकोप अधिक असल्याने या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी, कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर यांना या उष्णतेचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, कराड उपजिल्हा रुग्णालय व खासगी दवाखान्यांमध्ये उष्माघात व उष्णतेशी संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना भरपूर पाणी पिणे, डोके झाकून बाहेर पडणे, हलके व सूती कपडे वापरणे, तसेच थेट उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लहान मुले, वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.