कराड : जयसिंगपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील एका व्यापाऱ्याचे मारहाण करून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपहरणानंतर चौघा संशयितांनी व्यापाऱ्याकडील रोकड व दागिने असा सुमारे 12.35 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी जयसिंगपूर येथील पेपर ॲण्ड पेपर प्रोडक्टस् व्यावसायिक निकेत श्रीभगवान बियाणी (वय 43) हे त्यांचा चालक नवनाथ चोरमुले यांच्यासह गाडीतून साताऱ्याहून जयसिंगपूरकडे निघाले होते. कराडमधील दोघा व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन बियाणी हे चालकासोबत कारमधून सायंकाळी सहाच्या सुमारास गाडीतून कराडमधून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. कराडपासून काही अंतरावरील पुणे - बंगळूर महामार्गावरील पाचवड फाट्यावरील मॅकडोनाल्ड परिसरात कार आल्यानंतर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या हुंडाई ओरा गाडीतील चार व्यक्तींनी त्यांच्या कारला धडक देत त्याची गाडी बियाणी यांच्या कारला आडवी मारली. त्यानंतर काही समजण्यापूर्वीच चाकू व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून बियाणी यांच्यासह त्यांच्या चालकास मारहाण करण्यात आली.
त्यानंतर संशयितांनी बियाणी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून पाचवड फाटा, उंडाळे रोड, तुळसण परिसर या मार्गांवरून फिरवले. “15 कोटी रुपये दिले नाहीत, तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. तसेच बियाणी यांना त्यांच्या मित्रासह भावाला फोन करून अनुक्रमे 5 कोटी व 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यास भाग पाडले. भीतीपोटी बियाणी यांनी आपल्या कारच्या डिकीत व्यवसायाची रोख रक्कम असल्याचे संशयितांना सांगितले. त्यानंतर संशयितांनी कारमध्ये काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेले 10 लाख 35 हजार 700 रुपये व गळ्यातील सुमारे दोन तोळे सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. तसेच तेथून पलायन केले. संशयितांच्या मारहाणीमुळे जखमी झालेल्या बियाणी व चालकावर सांगली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.