वेलंग : मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कुठली शक्ती कुठे काम करते, कोणाची किती ताकद आहे, हे आम्हाला माहिती आहे. मी संघर्ष करुन दुष्काळी भागात पाणी नेले. तो संघर्ष तुम्ही का केला नाहीत. तुमच्या भागात तुम्ही पाणी का आणू शकला नाही?, असा सवाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना केला. दरम्यान, बावधन गावाच्या निर्णयाने काय होऊ शकते हे आपण वाई नगरपालिकेमध्ये बघितलं आहे. वाई नगरपालिका तो झांकी है, जिल्हा परिषद-पंचायत समिती अभी बाकी है, असा इशाराही ना. जयकुमार गोरे यांनी दिला.
बावधन, ता. वाई येथे माजी मंत्री स्व. मदनअप्पा पिसाळ यांचे पुत्र शशिकांत पिसाळ, माजी जि.प. अध्यक्षा सौ. अरूणादेवी पिसाळ, ॲड. विजयसिंह पिसाळ, दिप्ती पिसाळ, खंडाळ्याचे माजी सभापती एस. वाय. पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, धैर्यशील कदम, नगराध्यक्ष अनिल सावंत, सुनील काटकर, दिपक ननावरे, चिन्मय कुलकर्णी, सचिन भोसले, डी. एम. बावळेकर, रोहिदास पिसाळ, काशिनाथ शेलार, प्रसाद सुर्वे, दिलीप बाबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, वाई तालुक्याचे राजकारण गेली अनेक वर्षे सातत्याने राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. या तालुक्यात जे घडते, त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते. याच भूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी धाडसी निर्णय घेतले आणि त्या निर्णयांनी राजकीय इतिहास घडवला आहे. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल सावंत यांच्या विजयामध्ये शशिकांत पिसाळ यांचा मोलाचा वाटा आहे. विशेषतः पिसाळ कुटुंबाने सुरुवातीपासून घेतलेली भूमिका ही परिवर्तनाची नांदी ठरली, हे विसरता येणार नाही.
भाजपमध्ये येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा केवळ संख्या वाढवणारा नसून परिवर्तनाचा भागीदार असेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघात ही निवडणूक परिवर्तनाची संधी आहे. तुमच्या मनात जो उमेदवार आहे. जो खरोखर काम करणारा आहे, जो जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतो त्यालाच पुढे आणा. यापूर्वी घडवलेला इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे. या परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वांनी एकत्र सहभागी व्हावे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचे सक्षम प्रतिनिधी निवडून द्यावेत, ही अपेक्षा आहे. महायुतीमध्ये असताना आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. माझा थेट संबंध नसतानाही या भागातील प्रत्येक प्रक्रियेत मी सातत्याने सहभागी राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील धरणाचे पाणी बाहेरच्या जिल्ह्यात नेले. परंतु, या तालुक्यात व जिल्ह्यातील जनतेला का दिले नाही? जे आम्हाला जमलं ते तुम्हाला का जमलं नाही? दुष्काळी भागात पाणी नेण्यासाठी मोठा संघर्ष केला, तुम्ही का केला नाही? असा सवालही ना. गोरे यांनी ना. मकरंद पाटील यांना केला. मदनदादा भोसले म्हणाले, भविष्यात एक दिलाने काम करुन पक्षाला बळकटी देण्याचे काम केले जाईल. पिसाळ कुटुंबाबरोबर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकदिलाने काम करेल. यावेळी अरूणादेवी पिसाळ, विजयसिंह पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी. जि. प सदस्य दिलीप बाबर, बापूसाहेब शिंदे, बावधनच्या सरपंच वंदना कांबळे, प्रसाद सुर्वे, कृष्णा नवघणे, अशोक मांढरे, अशोक पिसाळ, विठ्ठल पिसाळ, लक्ष्मण ननावरे, चंद्रकांत खराडे, महेश ननावरे, प्रदिप जायगुडे, विकास भोसले, तानाजी यादव, विशाल राजपुरे, विकास यादव, अशोक पिसाळ, गणेश बनसोडे, चंद्रकांत मांढरे, वैभव कदम, प्रशांत कदम, महेंद्र कदम, सत्यजित कदम, सुनिल माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अंकिता कदम यांनी प्रास्तविक केले. चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.