सातारा : सरकारमधील कोणाच्यातरी सांगण्यावरून पोलिस सातारा जिल्ह्यात मंत्र्यांच्या अंगावर गेले. मंत्र्यांची अशी अवस्था असेल तर तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती... पोलिस आता आमदारांनाही जुमानणार नाहीत, अशी चिंता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळात व्यक्त केली.
सातारा जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडीवरुन महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आगडोंब उसळला होता. जिल्हा परिषदेच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना मतदानापासून वंचित ठेवले होते. याच सदस्यांनी बुधवारी पोलिसांनी आपले अपहरण केल्याचा आरोप पत्रकार परिषद केला होता. याच पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात मंत्र्यांच्या अंगावर पोलिस जायला लागले. हे जिल्हा परिषदेच्या सत्तेत विजय मिळवला त्यांना बरे वाटत असेल; परंतु या सभागृहात बसलेल्या प्रत्येक सदस्याच्या अंगावर कुठल्याही क्षणी पोलिस येऊ शकतात, हे विसरु नका.
सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी फार मोठा पराक्रम केला आहे. याआधी त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनामध्ये कोणाच्यातरी सांगण्यावरुन लाठी चार्ज केला होता. महिलांना मारहाण केली होती. या प्रकरणाची चौकशी झालेलीच नाही. कुणाच्या आदेशाने हा लाठीचार्ज करण्यात आला, ते देखील समोर आलेले नाही. सातारा जिल्हा परिषदेमध्ये दोन मंत्री बरोबर असताना त्यांना बाजूला सारुन राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिस पकडून घेऊन गेले. वास्तविक, या सदस्यांना मतदान करून नंतर ताब्यात घेतो, असे पोलिसांनी सांगायला हवे होते; परंतु तसे झाले नाही.
जिल्हा परिषदेच्या सत्तेत यश कोणाचे आणि अपयश कोणाचे, यापेक्षा भविष्यात पोलिस जुमानणार नाहीत. सरकारमधील कोणाच्यातरी आदेशाने या प्रकरणांमध्ये मंत्र्यांना देखील मारहाण करण्यात आली, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मंत्र्यांना मारहाण होत असेल तर तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती अशा शब्दांमध्ये आ. जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.