सातारा : इराण, इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. नाईलाजास्तव हॉटेल व्यावसायिकांनी चक्क चुली पेटवल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसू लागले आहे. काही ठिकाणी लाकडाच्या भट्ट्यांचा वापर सुरू झाला आहे.
आखाती युध्दामुळे देशात व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्यामुळे हॉटेल व्यवसाय गंभीर संकटात आला आहे. अशा स्थितीतही व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे पसंत केले आहे. गॅस वितरण थांबल्याने आणि दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांनी चुली व लाकडी भट्ट्यांचा आधार घेतला आहे. काही व्यावसायिकांनी इंडक्शन शेगडीचा वापर केला आहे. तर काहींनी हॉटेलच्या मागील बाजूस सिमेंटची चूल तयार केली आहे. तर काहींनी लोखंडी चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. यातून ग्राहक टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सुरू आहे.
चूल आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या वापराला मर्यादा असल्याने हॉटेलच्या मेन्यू कार्डवरील अनेक पदार्थ सध्या गायब झाले आहेत. चुलीवर सर्व पदार्थ करणे शक्य नसल्याने मोजकीच ऑर्डर हॉटेल व्यावसायिक स्वीकारताना दिसत आहेत. लहान-मोठ्या हॉटेलमध्ये अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅसऐवजी लाकडे जाळल्यास प्रदूषणाचा धोका वाढण्यास मदत होत आहे. ज्वलनातून निर्माण होणारा कॉर्बन मोनोऑक्साईड हानीकारक आहे. कार्बन डायऑक्साईड हरीतगृह वायू असून हवामान बदलाला कारणीभूत ठरतो. धुरातील सुक्ष्म कण हवेत पसरतात श्वासाद्वारे ते शरीरात जावून दमा व श्वसनाचे आजार वाढतात. तसेच नायट्रोजन ऑक्साईड वायू धूर तयार होण्यास आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करण्यास कारणीभूत ठरतो.
दरम्यान, सातारा शहर व परिसरातील गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी शनिवारी कायम होती. ठिकठिकाणी ग्राहकांच्या सिलिंडरसाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.
लाकडाचेही दर वाढण्याची शक्यता
सध्या अनेक लहान हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेते पर्याय म्हणून लाकडाचा वापर करत आहेत. बाजारात सध्या लाकूड 7 रुपये किलो दराने विकले जात आहे. मात्र, गॅस टंचाईची ही परिस्थिती कायम राहिल्यास लाकडाची मागणी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून त्याचे दरही वाढू शकतात, अशी भीती काही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.