सातारा / कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. महेश शिंदे गटाने घवघवीत यश मिळवले आहे. आ. महेश शिंदे गटाने कोरेगाव तालुक्यात 19, सातारा तालुक्यात 9 आणि खटाव तालुक्यात 3 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. आ. महेश शिंदे यांच्या करिष्म्यामुळेच कोरेगाव मतदारसंघात शिंदे गटाला इतके मोठे यश मिळाले आहे. 31 गावांवर सत्ता असली तरी याव्यतिरिक्त सत्ता नसलेल्या अनेक गावांमध्येही शिंदे गटाचे सरपंच झाले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्येही आ. महेश शिंदे यांच्या विचारांच्या सदस्यांची संख्या मोठी आहे. (Gram Panchayat Election Result)
आमदार झाल्यापासून आ. महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघ पिंजून काढला आहे. या कालावधीत गावोगावी जात त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या ते सोडवत आहेत. त्यामुळेच त्यांना जनतेची साथ मिळत आहे. त्याचीच झलक ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आली. कोरेगाव तालुक्यात आ. महेश शिंदे गटाने एकंबे, जळगाव, हिवरे, सुलतानवाडी, गोळेवाडी, वाघोली, सातारा तालुक्यात क्षेत्रमाहुली, जैतापूर, आरफळ, आरळे, बोरखळ, मर्ढे, मालगाव, देगाव, म्हस्वे आणि खटाव तालुक्यातील नागनाथवाडी, शिंदेवाडी व ललगुण या महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. (Gram Panchayat Election Result)
या निवडणुकीत राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील झालेल्या कुमठेचे सरपंचपद आ. महेश शिंदे गटाकडे तर बहुमत आ. शशिकांत शिंदे गटाकडे गेले आहे. कुमठेत राष्ट्रवादीचे 9 तर आ. महेश शिंदे गटाचे 6 सदस्य निवडून आले आहेत. माजी सभापती राजाभाऊ जगदाळे यांचे वर्चस्व राहिले असले तरी सरपंचपद आ. महेश शिंदे यांच्याकडे गेले आहे. एकंबे ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे गटाने बहुमत मिळवले असून सरपंच मात्र राष्ट्रवादीचा झाला आहे. (Gram Panchayat Election Result)
शिरंबे ग्रामपंचायतीची अटीतटीची निवडणूक झाली असून महेश शिंदे आणि राष्ट्रवादीकडून आमचेच उमेदवार निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. अंबवडे संमत, जांब खुर्द, चिमणगाव, सांगवी, वडाचीवाडी, रामोशीवाडीत राष्ट्रवादीने सत्ता संपादन केली आहे. जळगाव व हिवरेत आ. महेश शिंदे गटाने बाजी मारली आहे. पिंपोडे खुर्द येथे सरपंच महेश शिंदे गटाचा झाला असून राष्ट्रवादीकडे बहुमत गेले आहे.
आ. महेश शिंदे यांनी स्वत:चा गट बांधण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी आ. शिंदे यांना राष्ट्रवादीला कडवी झुंज द्यावी लागत होती. मात्र, ते आता आमदार झाल्यानंतर त्यांनी केलेल्या विकासकामांच्या झंझावातामुळे कुमठे, जळगाव, सुलतानवाडी, गोळेवाडी यासह अनेक गावात गट वाढवला आहे. आ. महेश शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात गाव व वाडीवस्तीवर विकासगंगा पोहचवली आहे. त्याची पोहचपावती त्यांना मिळाली आहे.
कोेरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. विरोधकांनी कारस्थाने केली. मात्र, जनता त्याला बळी पडली नाही. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवू शकलो. हा विजय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना समर्पित करत आहे. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार
नाही.
– आ. महेश शिंदे