औंध : औंध आणि परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना भेटून याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.
औंध येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी उपस्थितांच्या भावना ऐकून घेतल्या. यावेळी औंध शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, पंचायत समिती सदस्य शुभम शिंदे, दीपक नलवडे, गणेश देशमुख, इलियास पटवेकरी, अब्बास आत्तार, गणेश हरिदास, शहाजी यादव, तानाजी इंगळे, शिवाजी रणदिवे यांच्यासह जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
औंध व परिसरात अजित पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना चालना मिळाली असली, तरी काही महत्त्वाकांक्षी योजना अद्याप रखडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विकासकामांना गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे गरजेचे असल्याचे मत हणमंतराव शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच औंधसह 21 गावांच्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश आवश्यक असल्याचा सूर बैठकीत उमटला. त्यामुळे गायत्रीदेवी यांनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.