सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दि. 7 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकांसाठी आता मतदारांच्या बोटावर मार्करने निशाणी करण्यात येणार नाही. तर शाईच लावली जाणार आहे. त्यामुळे शाई पुसली गेली अशा तक्रारी येवू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील 2 हजार 877 मतदान केंद्रावर शाईच्या 8 हजार 600 बॉटल्स पोहोचवण्यात येणार आहेत.
राज्यात महापालिकांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांवेळी मार्कर पेनाचा वापर करण्यात आला होता. मार्करने बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. बोटांची शाई पुसल्याने दुबार मतदान झाल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली होती. त्यावरुन वादंग निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी निर्णय बदलला आहे. आता मार्करऐवजी शाईचा वापर करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 2 हजार 877 मतदान केंद्रे आहेत. सुमारे 21 लाख 94 हजार 110 मतदार या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. त्यामुळे मार्करऐवजी शाई बोटाला लावण्यात येणार आहे. ही शाई म्हैसूर येथून मागवण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर दोन बाटल्या देण्यात येणार आहेत. म्हैसूर पेंट अँड वार्निंश लि. या कंपनीची ही शाई पुरवण्यात आली आहे.