सातारा : शेती व शेतकर्यांशी निगडित असलेल्या ग्रामीण विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीची धामधूम सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. 63 सोसायट्यांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. निवडणूक लागलेल्या या गावांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये 952 विकास सेवा सोसायट्या कार्यरत आहेत. जिल्हा बँक व शेतकरी यांच्यात दुवा म्हणूक सोसायट्या काम करतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये विकास सेवा सोसायटीचे मत महत्त्वाचे असल्यामुळे तसेच गावावर वचक ठेवण्यासाठी सोसायटीमध्ये सत्ता असणे गरजेचे असते. या सत्तेचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये देखील नेत्यांना होत असतो. यासाठी विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये सर्वच नेते मंडळी लक्ष घालत असतात.
सध्याच्या घडीला निवडणूक लागलेल्या सोसायटीच्या गावागावांमध्ये निवडणुकीचे पॅनल तयार करण्याची लगबग सुरू आहे. उमेदवार फोडाफोडीचे राजकारण सध्या इरेला पेटलेले आहे. राखीव जागांवर उमेदवार निवडण्याची देखील घाईगडबड सुरू आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती, महिला प्रवर्ग या राखीव जागांसाठी उमेदवारांची खेचाखेची सुरू आहे. विकास विकास सेवा सोसायट्यांचे बरेचसे मतदार मुंबई, पुण्यात स्थायिक आहेत. निवडणुकीमध्ये हे मतदार गावाकडे आणण्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. राखीव जागेवर स्थानिक पातळीवरचा उमेदवार मिळाला नाही तर पुणे, मुंबईत स्थायिक असलेल्या मतदारांना उमेदवारी करण्यासाठी गळ घातली जात आहे.
सहकार प्राधिकरणाच्यावतीने निवडणूक लागलेल्या 43 विकास सेवा सोसायटीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर प्रशासनाच्या वतीने लवकरच निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या जाणार आहेत. तसेच उर्वरित 20 विकास सोसायटीमध्ये प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा उपनिबंधक तसेच तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयांच्या वतीने निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.