सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी सातारा जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. सातारा जिल्ह्यातील 116 केंद्रावर 38 हजार 66 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
दहावीची परीक्षा दि. 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दि. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च अशी दहावीची परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 778 शाळा व विद्यालयातील 38 हजार 66 विद्यार्थी 116 केंद्रावर परीक्षा देणार आहेत. तसेच जिल्ह्यात 15 परीरक्षक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे व्हिडीओ शुटींग तसेच भरारी व बैठे पथकामार्फत परीक्षा केंद्रांना भेटीचे नियोजन यासारख्या कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रात कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेआधी उपस्थित रहावे तसेच प्रवेशपत्र, ओळखपत्र व आवश्यक साहित्य सोबत असल्याची खात्री करून परीक्षा केंद्रावर विहीत वेळेत पोहोचावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी केले आहे.
परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठी पथके कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये सोडताना त्यांची तपासणी करूनच सोडण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.