सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातार्यातून मोळाचा ओढामार्गे वाईकडे जाणार्या मुख्य रस्त्यावरील नाले सैदापूर ते कोंडवे फाट्यादरम्यान जागोजागी तुंबल्याने पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असून, या पाण्यामुळे रस्ता एका बाजूला खचला आहे. सातारा शहरात पुण्यावरून येणारा जुना राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्याचे काम नुकतेच झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा झाला होता. मात्र, ऐन पावसाळ्यात परिसरातील व्यावसायिक, रहिवासी यांनी रस्त्याकडेच्या नाल्यांवर अतिक्रमण केलेले आहे. त्यांनी नाले मुजवले असल्याने पावसाचे पाणी जागोजागी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. पाऊस सुरू असल्याने एखादा मोठा ओढा जसा वाहतो, तसे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. सैदापूर फाट्यावर खोलगट भागातून जागा मिळेल तिकडे हे पाणी जाताना पाहायला मिळते. खोलगट भागातील दुकानगाळे तसेच रहिवासी वस्तीमध्ये हे पाणी शिरत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील तुंबलेले नाले पूर्ववत करणे जरुरीचे आहे; अन्यथा हा रस्ता पुन्हा खचून रस्त्यावरील वाहतुकीची गैरसोय होणार आहे.या रस्त्यावरून वाई, पुणे, मुंबईकडे असंख्य वाहनेे रोज जात असतात. रस्त्याचा वापर मोठा असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
जुना पुणे-बेंगलोर महामार्ग आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग वळवण्यात आला असला तरी सातारा शहरातून वाई, पुणेकडे जाणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जुन्या पुणे-बेंगलोर रस्त्याचे रूंदीकरण होणे जरूरीचे आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो.
या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. रस्त्याकडेला पूर्वी नाल्यांची व्यवस्था होती. मात्र, ती आता गायब झालेली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता तर खराब होतोच, मात्र वाहनचालक, पादचारी यांचे हाल होत आहेत.- प्रकाश देशमुख, रहिवासी