कराड : हणबरवाडी -धनगरवाडी उपसा सिंचन योजनेतील धनगरवाडी टप्पा क्र. 2 ची पाणी चाचणी यशस्वी झाली. या माध्यमातून निगडी व गायकवाडी पंप हाऊसमध्ये पाणी सोडून वितरण नलिकेमार्फत हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतासाठी देण्यात येणार असल्याची माहिती आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली. दरम्यान चाचणी यशस्वी झाल्याने विभागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हणबरवाडी -धनगरवाडी उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्षे रखडलेली होती. मसूर पूर्व विभागातील शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी कधी येणार या प्रतिक्षेत गेली अनेक वर्षे होते. परंतु आ.मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व युती शासनाच्या माध्यमातून या योजनेला गती मिळाली. त्यामुळे हणबरवाडी व धनगरवाडी टप्पा क्र.1चे पाणी गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहचले होते. टप्पा क्रमांक 2 चे काम प्रगतीपथावर असतानाच या टप्प्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे आश्वासन आ. घोरपडे यांनी दिले होते.
हणबरवाडी टप्पा क्र.2 ची सुधारीत प्रशासकीय मान्यता झाली असून त्यास पूर्ण निधीची तरतूद झालेली आहे. हणबरवाडी टप्पा क्र.2 येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याची माहिती आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली आहे. चाचणी यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.