सातारा : वातावरणीय बदलांमुळे मान्सूनचे आगमन लांबवणीवर पडले आहे. मृग नक्षत्र सुरु होवूनही पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला आहे. हवामान अंदाज, अल नीनोचा प्रभाव यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे जलस्त्रोत आटले असून बागायती पट्ट्यातही विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज आधीच हवामान खात्याने वर्तवला होता. त्याचा प्रत्यय आत्ताच येवू लागला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरीवर्ग सज्ज झाला आहे. मृग नत्रक्ष सुरु होवून आठवडा लोटला तरी पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात काही भागात वळीव पाऊसानेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीही होवू शकल्या नाहीत. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात टँकरवर तहान भागवली जात असून मान्सूनचे आगमन लांबल्याने पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर झाला आहे.
यावर्षी उन्हाळ्यात तापमान अधिक राहिल्याने बागायती पट्ट्यातही भूजलपातळी खालावली आहे. विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. खरीप हंगामाची पेरणी हंगामही लांबणीवर पडणार आहे. परिणाती शेतकरीवर्गाचे अर्थकारण कोलमडणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंता वाढली आहे. दरम्यान, कायना धरणासह सर्वच धरणांतील पाणी साठा झपाट्याने घटत असल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे.