पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी या प्रमुख पर्यटन मार्गावर मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग सध्या धूळखात पडला आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाईवरून येणाऱ्या मार्गावरील टोल नाका ते शॉपिंग सेंटर या दरम्यान सध्या तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र, कायमस्वरूपी काम होणार असताना तात्पुरते डांबरीकरण का करण्यात येत आहे? असा सवाल केला जात आहे.
बेबी पॉईंट ते अंजुमन शाळा या दरम्यानचा रस्ता अनेक दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला असून अपघातांच्या घटनाही घडत आहेत.
तात्पुरते डांबरीकरण करून संबंधित ठेकेदार मुख्य काम पुढे ढकलत आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर खराब रस्त्याचा थेट परिणाम पर्यटकांवर होत असून गेल्या सहा महिन्यांत कोणतीही प्रगती झालेली नाही. याचा उन्हाळी पर्यटन हंगामावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच हॉटेल, दुकाने आणि इतर व्यावसायिकांनाही याचा आर्थिक फटका बसू लागला आहे.
तात्पुरत्या डांबरीकरणाचा दर्जाही निकृष्ट असून काही ठिकाणी डांबर लगेच उखडताना दिसत आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपायांऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काम कधी पूर्ण होणार याची माहिती द्यावी, रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. या मार्गाची दुरुस्ती लवकर न झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. मुख्य रस्त्याचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि नागरिकांना चांगल्या दर्जाचा रस्ता कधी उपलब्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.