खटाव : राज्याच्या ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा खूप चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यातील गावेच्या गावे कंबर कसून कामाला लागली आहेत. या अभियानाच्या स्पर्धा कालावधीत ग्रामविकास विभागाचा चांगला कस लागणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन नागपूर येथील मंत्रिपरिषद सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, शिवाली परब, भरत गणेशपुरे, पृथ्वीक प्रताप, संदीप पाठक उपस्थित होते.
राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांना समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटल, स्वयं अर्थपूर्ण असाव्यात, तसेच गावांचा पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानासाठी सहकार्य करणारे प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.