सातारा : सातार्यात तब्बल 32 वर्षांनंतर 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सातार्यात मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फांउडेशनच्या वतीने 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु असून नियोजनाबाबत विविध बैठका सुरु आहेत. सातार्यातील संमेलनाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी ना. फडणवीस बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, संचालक अक्षय गवळी आणि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे संमेलनाची तयारी गतिमान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पिता आणि पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा योग 99 व्या संमेलनात जुळून आला आहे, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी दिली.