तासवडे टोलनाका: कराड तालुक्यातील तासवडे, वहागाव, बेलवडे हवेली, घोणशी, खोडशी परिसरातील कृष्णा नदीला दुर्गंधीयुक्त केमिकलचे पाणी सोडण्यात आले आहे. या केमिकलच्या पाण्यामुळे नदीतील हजारो मासे इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यातील प्रदूषण नियामक मंडळ अजुनही झोपेतच असून परिसरातील दवाखाने उलट्या, जुलाब, कावीळ रुग्णांच्यामुळे हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीला दुर्गंधीयुक्त केमिकलचे पाणी सोडणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
उंब्रज, वराडे, तासवडे, बेलवडे हवेली, वहागाव, घोणशी, खोडशी आणि पुढे तसेच कराड या परिसरातून कृष्णा नदी वाहत आहे. कृष्णा नदीच्या काठावरच या परिसरातील प्रत्येक गावाची पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल उभारण्यात आले आहेत. नदीचे पाणी जॅकवेलमध्ये आल्यानंतर विद्युत पंपाने उचलून ते गावाला दिले जाते. दरम्यान, चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीला दुर्गंधीयक्त केमिकलचे पाणी आले आहे. केमिकलच्या पाण्यामुळे नदीकाठच्या संपूर्ण परिसरात दुर्गंध येत आहे. कृष्णा नदीकाठी या परिसरातील अनेक गावांची जॅकवेल आहेत. या जॅकवेल मधूनच गांवाना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या रासायनिक केमिकलच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उलट्या, मळमळ, जुलाब, कावीळ यासारख्या रुग्णांनी तासवडे, बेलवडे हवेली, वहागाव, खोडशी, घोणशी परिसरातील दवाखाने हाउसफुल झाले आहेत. तसेच कृष्णा नदी पुढे कराड शहरापासून जाते. त्यामुळे या परिसरात साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अशाच प्रकारे गेल्या महिन्यात कृष्णा नदीला दुर्गंधी युक्ती केमिकल सोडण्यात आले होते. त्यावेळीही या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आणि तोच प्रकार पुन्हा झाला आहे. त्यामुळे जाणून-बुजून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा प्रकार चालू आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.