पंढरपूर : पावसाचा जोर कमी झाल्याने उजनी धरणातील भीमा नदीत होणारा विसर्ग कमी झाला असून, धोक्याच्या पातळीकडे मार्गक्रमण करणार्या चंद्रभागा नदीचा पंढरपूर येथील पुराचा धोका सध्यातरी टळला आहे. त्यामुळे नदीकाठच्या व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
नीरा व भीमा खोर्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे नीरा व उजनी धरण भरले आहे. त्यामुळे भीमा नदीत उजनीतून ९० हजार, तर वीर धरणामधून ४० हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तो सोमवारी (दि. ३) कमी करून उजनी धरणामधून ६० हजार, तर वीर धरणातून २४ हजारांचा विसर्ग सुरू आहे.
पाण्याचा वेढा कायम
दरम्यान, सोमवारीही (दि. ३) चंद्रभागा नदी इशारा पातळीवरून वाहत होती. वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत. कोल्हापूर पद्धतीचे उंबरे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णुपद, अजनसोंड, बठाण हे आठही बंधारे पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक बंदच आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.