वाई : एवढी वर्षे सत्ता असूनही मांढरदेव परिसराचा अपेक्षित विकास झाला नाही. विद्यमान आमदारांना भरीव तरतूद करता आली नाही. काळूबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात; मात्र त्यांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता भाजपच मांढरदेवचा विकासरथ गतिमान करेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली.
मांढरदेव, ता. वाई येथे आयोजित भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदन भोसले, शशिकांत पिसाळ, माजी जिप अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, बावधन जिल्हा परिषद उमेदवार दिप्ती पिसाळ, पंचायत समिती उमेदवार सचिन भोसले, अभेपुरी गणाच्या उमेदवार सौ. अनिता कोंढाळकर, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, अजित मांढरे, दीपक ननावरे, जितू पिसाळ, विजयसिंह पिसाळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. गोरे म्हणाले, तुमच्याकडे आमदार, खासदार, मंत्री, बँक अध्यक्ष आणि साखर कारखान्यांचे चेअरमन आहेत. तरीही उमेदवार आमच्याकडून घ्यावे लागतात, हे तुमचे अपयश नाही तर काय? ग्रामपंचायत कार्यालये, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, मंदिर विकास, घरकुल योजना, विहिरी, पाणीपुरवठा, वीज डीपी आणि पर्यटन विकासाची कामे ग्रामविकास खात्यातून मंजूर होतात. माझ्या खात्याचा 54 हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे बावधनच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची ताकद माझ्याकडे आहे. बावधन-हुमगाव रस्त्याचा विकास, मंदिरांना ‘ब वर्ग’ पर्यटन दर्जा आणि मांढरदेव परिसराच्या पर्यटन विकासासाठी गती देणार आहे.
ॲड. दिप्ती पिसाळ म्हणाल्या, आयात उमेदवार देऊन निवडणूक जिंकण्याचे प्रयोग जनतेने यापूर्वीही पाहिले आहेत; हा प्रयोग पुन्हा फसणारच आहे. गेली वीस वर्षे गटबाजी सुरू आहे; मात्र शेतीचे पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि रोजगार या प्रश्नांपैकी एकही प्रश्न सुटलेला नाही. पश्चिम भागात एकही सुसज्ज आरोग्य केंद्र नाही. साध्या उपचारासाठीही नागरिकांना शहरात जावे लागते.