सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी युतीधर्म पाळला गेला नाही हे दु:ख आजही मतदारांच्या मनात आहे. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होत असताना तुमच्या मित्र पक्षांनी तुमचा अध्यक्ष होवू दिला नाही. तुम्हाला रक्तबंबाळ केले आहे. महिला व सर्व सदस्यांमध्ये याची आजही खंत व सल आहे. अशा प्रकारे झालेला प्रकार अजिबात विसरता कामा नये. आमच्या मतदारांसह महायुतीमधील अनेक सदस्य हे आमच्या उमेदवाराला मतदान करतील. एवढंच नव्हे तर भाजपाचे काही मतदार आम्हाला मतदान करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
सातारा तहसील कार्यालयात मतदानावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे म्हणाले, पालकमंत्री हे जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आमच्याबरोबर होते. आता ते भाजपाबरोबर आहेत. युती धर्म पाळायचा का नाही हे त्यांनी ठरवावे. शंभूराज असे त्यांचे नाव असून ते नावाप्रमाणेच राज करतील. ज्यावेळी स्वाभिमान डिवचला जातो त्यावेळी पक्ष व युतीधर्म बघितला जात नाही. युतीधर्म पेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. सदस्यांनी त्यावेळी काय घडले यावर निर्णय घ्यावा आम्ही त्यावेळी त्यांच्याबरोबर होतो आणि आजही आहे. त्यांना मदत सुध्दा केली आहे. त्यांच्या आंदोलन प्रक्रियेमध्ये मी स्वत: सहभागी होतो. त्यांनी कोणता निर्णय घेतला हे जनता लक्षात ठेवणार आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण होणार या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही. या बातम्या फक्त चर्चेला येत आहेत. आम्ही पक्ष म्हणून आमच्या पध्दतीने काम करणार आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांचा पुरोगामी विचारांचा सातारा जिल्हा पुन्हा करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा पिंजून काढणार आहे. सगळ्या घटकांना बरोबर घेणार आहे. पाण्याचे वाटप, शेतकरी प्रश्न याकडे सरकारचे लक्ष नसून फक्त सत्ता आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. निवडणुकीमध्ये घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घोडबाजाराचे पैसे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरले पाहिजे होते.
कोरेगाव मतदारसंघातील मतदार कोणाला मतदान करतील यावर शिंदे म्हणाले, स्व. अजित पवार हयात असताना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आमचे उमेदवार हे घड्याळावर लढवले होते. महायुती की महाविकास आघाडी हा मतदारांचा प्रश्न आहे. कोरेगाव मतदारसंघात नव्हे तर महायुतीतील घटक पक्षांना आम्ही सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी युतीधर्म पाळला गेला नाही हे दु:ख आजही तुमच्या मनात आहे.