सातारा :
कोणाच्याही घर वापसीची चर्चा नाही. अजित पवार यांना शरद पवार यांच्या घरात प्रवेश असेल. परंतु, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय ते अजित पवार यांना पक्षात प्रवेश देणार नाहीत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. Jayant Patil
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात स्थान; मात्र कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच त्यांना पक्षात घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे खा. शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत विचारले असता आ. जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या अशा बोलण्यातून दोन अर्थ निघतात. संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच कोणाच्याही प्रवेशाचा ते निर्णय घेतील. कार्यकर्त्यांच्या मताला पक्षात महत्त्वाचे स्थान आहे, हेदेखील त्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
आ. पाटील पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये माझा दौरा सुरू आहे. २८ जुलैपर्यंत दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण होईल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून
विधानसभा निवडणुकीसाठी चांगले उमेदवार निवडण्याची जबाबदारी आमची आहे. ते म्हणाले, विशाळगड परिसरात झालेला हिंसाचार हे राज्य सरकारचे अपयश आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती घेतलेल्या लोकांचेच जमा होऊन हल्ला केल्यानेच मोठे नुकसान केले. ठराविक समाजाला लक्ष्य करून त्यांना मारहाण करण्यात आली. विशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गजापूर गावात दोनच पोलीस तैनात करण्यात आले होते. या गावात गुंडागर्दी सुरू असताना पोलिसांनी योग्य कार्यवाही केलेली नाही. हिंसाचार करणाऱ्या कडक कलमे लावावी.
विशाळगडावर शिवप्रेमींच्या नावाखाली काही गुंडांनी हिंसाचार केला. या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. सरकारने पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमणे काढायला हवी होती. येथे हिंसाचार करणाऱ्यांच्या पाठीशी जो कोणी असेल, त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. यावेळी राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील उपस्थित होते. Jayant Patil