सातारा : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहिला आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हाभर घड्याळाचा गजर घुमवा. जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राखण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, तरुणांना अधिक संधी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुंबईतील वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू आहेत. या बैठकीमध्ये गुरुवारी सातारा जिल्ह्यातील पक्षीय कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुनील तटकरे यांनी संबंधित भागातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत, पक्षाची विद्यमान संघटनात्मक रचना, स्थानिक राजकीय परिस्थिती, आव्हाने तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी आणि धोरणात्मक नियोजन यावर सखोल चर्चा केली. यासोबतच स्थानिक विकासकामे, पक्षविस्तार आणि संघटनात्मक कार्य याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.
ना. अजित पवार म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने, उत्साहाने आणि जबाबदारीने काम करुन पक्ष अधिक बळकट करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना संधी देऊन पक्षाची वाटचाल पुन्हा ताकदीने करण्याचे आवाहनही ना. पवार यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले, सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यावर आम्ही भर दिला आहे. प्रत्येकाला योग्य त्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यांनी आपला अधिकार वापरुन संघटन अधिक मजबूत करावे. आगामी काळामध्ये पक्षासमोर मोठी आव्हाने असणार आहेत. ज्यांनी पक्षासाठी योगदान दिले, त्यांना पक्षाने चांगली संधी आतापर्यंत दिली आहे. आता जनतेमधील प्रभावी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संधी देण्यात येणार आहे.