कराड: अशाप्रकारे रस्त्यावरून फिरणार्‍या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  Pudhari Photo
सातारा

मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद

पुढारी वृत्तसेवा

कराड : अमोल चव्हाण

सध्या कराडसह मलकापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावरुन मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरत असून मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांसह वृद्ध तसेच लहान मुले व महिलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

काही दिवसांपुर्वी कोल्हापूर नाका येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांपासून नागरिकांच्या तसेच वृध्द व लहान मुलाच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. याचा गांर्भियाने विचार करून कराडसह मलकापूर नगरपरिषदेने मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे नेते दादा शिंगण यांनी केली आहे. अन्यथा नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्याबरोबरच तहसिलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत दादा शिंगण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर व कराड येथील नागरिक यांचा भटक्या कुत्रांपासून जीव वाचवावा. पिसाळलेला कुत्रा जुलै महिन्यात काही महिला, पुरुषांना चावला. असे असतानाही मलकापूर नगरपालिकेने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यानंतर परत पिसाळलेला कुत्र्याने एक ऑगस्ट रोजी पुन्हा कोल्हापूर नाका परिसरापासून ढेबेवाडी फाटा व पुढे चचेगावपर्यंत पंधरा ते वीस नागरिकांना व लहान मुले तसेच 40 ते 50 भटकी कुत्री यांचा चावा घेतला. मी त्या कुत्र्यांचा पाठलाग करून अनेक नागरिकांना वाचवले. अन्यथा अजून काही लोकांना सदर कुत्र्यांनी चावा घेतला असता व त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. तो पिसाळलेला कुत्रा ज्या इतर कुत्र्यांना चावलेला आहे त्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा तेही कुत्री पिसळून आणखी नागरिकांना चावतील व जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करावे.

याबाबत कराड शहरातील पशुवैद्यकीय अधिकारी यांना भेटुन पिसाळलेला कुत्रा व त्यांनी चावा घेतलेल्या मनुष्य व प्राणी यांच्याबाबत माहिती घेतली. जेव्हा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी जी माहिती दिली ती अतिशय धक्कादायक व चिंताजनक आहे. एकादा पिसाळलेला कुत्रा मनुष्य किंवा प्राणी यांना चावल्यास त्याच्यापासून रेबीज नावाचा गंभीर आजार होतो. पिसाळलेल्या कुत्रांच्या लाळीमध्ये रेबीजचे विषाणू असतात. ते विषाणू चावा घेतलेल्या जखमेतून प्रवेश करतात व मज्जासंस्थेद्वारे मेंदूकडे मार्गक्रमण करतात. कुत्रा चावलेल्या मनुष्य किंवा प्राणी यांच्यामध्ये रेबीज रोगाची लक्षणे दाखविण्याचा कालावधी हा चावा घेतलेली जागा मेंदूपासून किती अंतरावर आहे, यावर अवलंबून असते. रेबीज होण्याअगोदर प्रतिबंधक लस घेणे हा एकमेव पर्याय आहे, असे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले असल्याचेही दादा शिंगण यांनी निवेदनात म्हटले आहे.

...अन्यथा नगरपरिषदांवर मोर्चा काढणार

कराड व मलकापूर नगरपालिका, शहर पोलीस अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, तहसिलदार, डीवायएसपी, प्रांत यांना आवाहन करतो की सदर घटनेची दखल घ्यावी. दोन्ही शहरात नागरिकांची नेहमीच रहदारी असते. तसेच लहान मुलांच्या शाळा व कॉलेज आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे होणार्‍या भयंकर अशा रेबीज रोगापासून नागरिकांचे संरक्षण करावे. अन्यथा सोमवार दि.12 रोजी कराड तहसीलदार येथे लक्षणीक उपोषण करणार आहे. त्यातून न्याय न मिळाला तर कराड आणि मलकापूर नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे, असा इशाराही दादा शिंगण यांनी दिला आहे.

अशी आहेत रेबीज रोगाची लक्षणे...

रेबीज रोगाची लक्षणे म्हणजे मनुष्य किंवा प्राणी पाण्याला घाबरतो, हिंसक होतात, गिळण्यास त्रास होतो, तोंडातून सतत लाळ गळत रहणे. या रोगावरती उपचार नाही. त्यामुळे रेबीज सारख्या महाभयंकर रोगाची गांभीर्याने दखल घेऊन ज्या ज्या मनुष्य व प्राणी यांना पिसाळलेला कुत्रा चावलेला आहे. त्या सर्वांना लवकरात लवकर रेबीजचे लसीकरण करून घ्यावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT