कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा
पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या समस्यांचे कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी आणि दुष्काळी भागातील शेतकर्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाणी पोहोचवण्याच्या निर्धाराला बळ देण्यासाठी महायुती सरकारने सातारच्या कृष्णानगरमध्ये भव्य आणि दिव्य ‘सिंचन भवन’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सिंचनाचे विषय होते. महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुक्यामधून अभियंत्यांना कार्यालयीन कामकाजासाठी अथवा महत्त्वपूर्ण कामांसाठी सातत्याने प्रवास करावा लागत होता. त्यामध्ये वेळेचा अपव्यय होत होता, ही बाब लक्षात घेऊन सातारा येथे मध्यवर्ती ठिकाणी कृष्णानगरमध्ये नवीन सिंचन उभारण्याचा मनोदय ना. महेश शिंदे यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीसाठी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे या प्रकल्पाची वाट मोकळी झाली आहे. नव्याने उभारण्यात येणारे ‘सिंचन भवन’ पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या व्यवस्थापनाचे प्रमुख केंद्र असेल. या भवनातून सर्व सिंचन प्रकल्पांचे एकाच छताखाली नियोजन, देखरेख व नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे सिंचनाच्या प्रलंबित कामांचा वेगाने निपटारा होईल आणि शेतकर्यांना अधिक जलसंपन्नता मिळणार आहे. सातार्यातील हे सिंचन भवन आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारले जाणार असून, या माध्यमातून जलसंपदा विभागाच्या कामात सुसूत्रता येईल.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाचे कामकाज जलद गतीने करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या समस्यांवर अधिकाधिक लक्ष देऊन त्या मार्गी लावण्यासाठी या ‘सिंचन भवन’ प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा अधिक प्रभावी कसा करता येईल, यावर विस्तृत चर्चा झाली.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी सोपवल्यानंतर ना. महेश शिंदे यांनी तारळी धरणातील साडेचार टीएमसी पाण्याचा प्रश्न मिटवला. यामुळे कराड उत्तरसह खटाव व सांगलीतील सीमा भागाचा प्रश्न मिटला. कोरेगाव मतदारसंघासाठी जादाचे दोन टीएमसी पाणी मिळवून दिले. रखडलेले हणबरवाडी धनगरवाडी प्रकल्प मार्गी लावला. कमी कालावधीमध्ये ना. महेश शिंदे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सोडवला आहे. यावर्षी उन्हाळ्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळी तालुक्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. ना. महेश शिंदे यांच्या माध्यमातून सातारच्या कृष्णानगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या नवीन सिंचन भवन प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्राची वाटचाल दुष्काळमुक्तीकडे राहणार आहे.