सातारा : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाळ्याची दाहकता वाढू लागल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील 80 गावे व 450 वाड्यांमधील 1 लाख 6 हजार 519 नागरीकांना व 68 हजार 84 जनावरांना 78 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पावसाळ्याचे वेध लागले असतानासुध्दा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उन्हाच्या झळा लागत असून जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. बहुतांश ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अद्यापही कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. पिण्याचे पाणी नसल्याने शेतीच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता चांगलीच वाढली आहे. पाण्याबरोबर जनावरांच्या चार्यांचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, तोंडले, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिर, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, शेवरी, धुळदेव, वरकुटे-म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, पिंगळी बु., मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारुगड, कुळकजाई, शिरवली, सत्रेवाडी, टाकेवाडी, उकीर्डे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बु., महिमानगड, सुरुपखानवाडी, पांढरवाडी, दोरगेवाडी यासह 49 गावे 357 वाड्यांमधील 71 हजार 494 नागरिक व 54 हजार 297 जनावरांना 52 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
खटाव तालुक्यातील मांजरवाडी, नवलेवाडी, मोळ, जायगाव, करांडेवाडी, एनकुळ, डांभेवाडी, तडवळे, दातेवाडी, अनफळे, खातवळ, धोंडेवाडी, कामथी, कटगुण, उंबरमळे, कातळगेवाडी, कान्हरवाडी, जाखणगाव यासह 18 गावे व 81 वाड्यांमधील 20 हजार 512 नागरिक व 6 हजार 239 जनावरांना 12 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, शिद्रुकवाडी वरची खळे, शिद्रुकवाडी काढणे, भोसगाव आंब्रुळकरवाडी, चव्हाणवाडी नाणेगाव यासह एका गावासह 4 वाड्यांमधील 1 हजार 586 नागरिक व 987 जनावरांना 3 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
वाई तालुक्यातील मांढरदेव, गुंडेवाडी, बालेघर, आनंदपूर गावठाण मांढरदेव अंतर्गत गडगेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी यासह 4 गाव व 3 वाड्यांमधील 3 हजार 580 नागरिक व 1 हजार 455 जनावरांना 5 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील, भंडारमाची, अनभुलेवाडी, अंबवडे सं. वाघोली, चवणेश्वर, गुजरवाडी, बिचुकले, विखळे या 7 गावांमधील 6 हजार 697 नागरिक व 5 हजार 106 जनावरांना 5 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील मिरगावसह 5 वाड्यांमधील 2 हजार 650 नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे टँकर भरण्यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी 31 विहिरी व 14 बोअर अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.