सांगली; विवेक दाभोळे : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंच्या अंतर्गत स्वस्त धान्य योजनेतून देण्यात येणारा मोफत गहू, तांदूळ काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील 6 लाख 55 हजार 787 शिधापत्रिकाधारकांना काही काळासाठी तरी मोफत धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
दरम्यान, या योजनेचा पात्र गरजूंनाच लाभ मिळावा, यासाठी चालू महिन्यात पडताळणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सन 2020 एप्रिलमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, कष्टकरी, सामान्यांचे अन्नासाठी हाल होऊ लागले. त्यावेळी केंद्र सरकारने पात्र गरजू लाभार्थींना मोफत तांदूळ, गहू देण्याचा निर्णय घेतला होता. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत याची अंमलबजावणी करण्यात येत होती. यातून दारिद्य्र रेषेखालील आणि दारिद्य्र रेषेवरील केशरी शिधापत्रिकांना लाभ मिळत आहे. जिल्ह्यातील अशा 6 लाख 55 हजार 787 शिधापत्रिकाधारक कुटुंबांना याचा दिलासा मिळत होता. यात दारिद्रयरेषेखालील 64 हजार 930 आणि अंत्योदय योजनेतील 31 हजार 781 शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळत होता. दारिद्य्र रेषेवरील; पण केशरी शिधापत्रिकाधारक अशा 5 लाख 59 हजार 76 शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळत होता.
मात्र याचवेळी लाभधारकांत अनेक बिनगरजू, धनदांडगे शिधा पत्रिकाधारकांचा समावेश होत असल्याच्या तक्रारी होत्या. यातूनच सरकारने अडीच – तीन महिन्यांपूर्वीच ही योजना बंद करण्याची भूमिका जाहीर केली होती. आता सप्टेंबरअखेर ही योजना तात्पुरती स्वरूपात तरी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचप्रमाणे याचा लाभ घेणार्या बिनगरजू, अधिक उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांचे सर्र्वेक्षण या महिन्यात करण्यात येणार आहे. तोपर्यंत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य योजनेतूनच विकतचे धान्य घ्यावे लागणार आहे. यात प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजनाअंतर्गत कार्डधारकाकरिता रेशन व्यतिरिक्त मोफत 5 किलो गहू, तांदूळ वितरण सुरू होते.