सांगली; पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकर्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान लवकरच देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. जिल्ह्याला सुमारे 600 कोटींहून अधिक रक्कम मिळेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात नियमित कर्जदार शेतकर्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. अल्पमुदत पीक कर्ज वेळेत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्या कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे. मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकर्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 2017-18 मध्ये 1 लाख 30 हजार, 2018-19 मध्ये 1 लाख 19 हजार तर 2019-20 मध्ये एक लाख शेतकर्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे. याशिवाय हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकर्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
वर्ष शेतकरी (लाखात) कर्ज परतफेड (कोटीत)
2017-18 1.30 548.26
2018-19 1.19 772.31
2019-20 1.00 668.07