सांगली

सांगली : जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री बारा वाजल्यापासून ते सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले. कृष्णा, वारणा, मोरणा नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. चांदोलीतून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

जुलैमध्ये सलग पंधरा दिवस पाऊस पडला. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून काहीशी उघडीप दिली. अधूनमधून हलका, मध्यम पाऊस पडत होता. परंतु रविवारी रात्री बारा वाजल्यापासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. सकाळी सात ते नऊ या कालावधीत तर ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यानंतर तासभर रिपरिप सुरू होती. त्यानंतर पुन्हा अकरा वाजल्यापासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत तुफान बरसात सुरू होती. चार वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात जोरदार पाऊस पडला. यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

दरम्यान, पावसाने काही तालुक्यात अतिपाण्यामुळे पिके वाया जाण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, मोरणा नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांत धास्ती वाढू लागली आहे.

चांदोलीतून विसर्ग सुरू

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे धरणात 11 हजार क्युसेक पाण्याची आवक प्रतिसेंकद होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा 28.78 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना व ग्रामस्थांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. कोयना, धोम, कण्हेरमधूनही केव्हाही विसर्ग करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT