इस्लामपूर; मारूती पाटील : वाळवा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरू झाले आहे. या निवडणुकीत सरपंचपद खुले असलेल्या 25 गावांत जोरदार टशन पहायला मिळणार आहे. जाहीर झालेल्या 88 गावांपैकी 46 गावात महिला सरपंच होणार आहेत.
वाळवा तालुक्यात 94 गावे आहेत. त्यापैकी तांबवे, शिरटे, कारंदवाडी, मसुचीवाडी, भाटवाडी, साटपेवाडी या सहा गावांच्या सोडून उर्वरित 88 गावांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 88 पैकी 25 गावातील सरपंचपद खुले आहे. तर 28 गावात सर्वसाधारण महिला, 12 गावांत ना.मा.प्र. सर्वसाधारण, 5 गावांत अनुसूचित जाती सर्वसाधारण, 13 गावांत ना.मा.प्र. महिला, 4 गावांत अनुसूचित जाती महिला तर एका गावात अनुसूचित जमाती महिला, असे सरपंचपदाचे आरक्षण आहे.
या 88 गावांपैकी बोरगाव, रोझावाडी, ओझर्डे, रेठरेधरण, कामेरी, जक्राईवाडी, कार्वे, येलूर, देवर्डे, दुधारी, अहिरवाडी, फार्णेवाडी (बो), धोत्रेवाडी, माणिकवाडी, महादेववाडी, नायकलवाडी, जांभुळवाडी, विठ्ठलवाडी, मरळनाथपूर, ठाणापुडे, फार्णेवाडी (शिगाव), पोखर्णी, नेर्ले, ढगेवाडी, चिकुर्डे या 25 गावांतील सरपंचपद खुले आहे. त्यामुळे या गावांत निवडणुकीत प्रचंड चुरस पहायला मिळणार आहे. बहे, करंजवडे, पेठ, कुरळप, तुजारपूर, सुरूल, वशी, कोळे, कापूसखेड, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, पडवळवाडी या 12 गावांत ना.मा.प्र. पुरुष तर शिरगाव, ढवळी, बहादूरवाडी, इटकरे, वाळवा या 5 गावांत अनुसूचित जमाती, असे आरक्षण आहे.
किल्लेमच्छिंद्रगड, लवंडमाची, ताकारी, जुनेखेड, गोटखिंडी, भडकंबे, नागाव, कोरेगाव, शिगाव, काळमवाडी, घबकवाडी, मालेवाडी, भरतवाडी, कणेगाव, गौंडवाडी, गाताडवाडी, येवलेवाडी, वाघवाडी, शेखरवाडी, डोंगरवाडी, बेरडमाची, मिरजवाडी, फाळकेवाडी, काकाचीवाडी, बागणी, शेणे, केदारवाडी, लाडेगाव या 28 गावांत सर्वसाधारण महिला तर कासेगाव, नवेखेड, शिवपुरी, बिचूद, बनेवाडी, वाटेगाव, येडेनिपाणी, रेठरेहरणाक्ष, हुबालवाडी, नरसिंहपूर, साखराळे, मर्दवाडी, बावची या 13 गावांत ना.मा. प्र. महिला, कुंडलवाडी, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, खरातवाडी या 4 गावांत अनुसूचित जाती महिला व तांदुळवाडी या एकमेव गावात अनुसूचित जाती महिला, असे सरपंचपदाचे आरक्षण आहे.
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांच्या तालुक्यात वर्चस्वासाठी हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी गावोगावच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मतभेद भाजूला ठेवून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवा, अशा सूचना केल्या आहेत. भाजपच्या राहुल महाडिक, निशिकांत पाटील, सम्राट महाडिक या नेत्यांनीही ग्रामपंचायतीच्या आखाड्यात ताकतीने उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे.