सांगली : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकत दाखल करण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी 24 हरकती दाखल झाल्या. त्यामुळे हरकतींची एकूण संख्या 34 वर पोहचली आहे. सर्वाधिक हरकती या आटपाडी तालुक्यातून 11 दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मतदारसंघाची भौगोलिक सलग्नता नाही, गाव आहे त्याच मतदारसंघात ठेवावे, या प्रकारच्याच हरकती सर्वाधिक दाखल झाल्या आहेत. आता 22 जूनपर्यंत या हरकतींवर सुनावणी होऊन प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. दि. 27 जूनरोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द होणार आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप रचना 2 जून रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर 8 जूनपर्यंत या प्रारूपबाबत हरकती घेण्यास मुदत देण्यात आली होती. ही मुदत बुधवारी संपली. पाच दिवसात 10 हरकती दाखल झाल्या होत्या. बुधवारी शेवटच्या दिवशी 24 हरकती दाखल झाल्या. त्यामुळे हरकतींची एकूण संख्या 34 वर पोहचली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मूळ मतदारसंघातून काही गावे वगळून नव्या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
हे करताना काहींच्या सोईची गावे मतदारसंघात राहिलेली नाहीत. आपल्या बाजूने सुरक्षित वाटणारी गावे मतदारसंघातून कमी होऊन नव्याने राजकीयदृष्ट्या गैरसोईची, विरोधकांचे प्राबल्य असणारी गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे काही जणांची राजकीय सोय झाली आहे तर, काहींची गैरसोय झाली आहे. उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण या जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणूक 2022 च्या नोडल अधिकारी आहेत. सर्व हरकती त्यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर दि. 22 जूनपर्यंत आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार आहे.
जि. प. व पंचायत समिती प्रारूप रचनेबाबत दाखल करण्यात आलेल्या हरकतींची तालुका निहाय संख्या पुढीलप्रमाणे : आटपाडी 11, मिरज 5, तासगाव 5, जत 3, पलुस 5, वाळवा 4 व शिराळा 1, एकूण 34.