कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्याच्या करोली टी गावातील एका शांत, साध्या आणि सर्वसामान्य वाटणाऱ्या कुटुंबातील पत्नीनेच पतीचा खून करण्याचा भीषण आणि थरारक कट रचला असेल, याची साधी भनकही गावातील कुणालाच नव्हती. 28 मार्चला रात्री गावात नेहमीप्रमाणे शांतता होती, रोजच्या व्यवहारात कुठलाही संशय नव्हता; पण भारत कर्पे यांच्या घरात जे काही घडलं, त्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. विश्वास, नाती आणि माणुसकी यांचा थरकाप उडवणारा हा प्रकार आता उघडकीस आला असून प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे, ते म्हणजे... “नवऱ्याने लावला लळा आणि बायकोने घोटला गळा.”
28 मार्चला रात्री सुमारे 9:15 वाजण्याच्या सुमारास भारत इराप्पा कर्पे हे आपल्या घरातच होते. हे घर म्हणजे माणसासाठी सुरक्षित आश्रयस्थान असते; पण याच घरात त्या रात्री त्यांच्या आयुष्याचा शेवट होणार आहे, याचा मागमूससुद्धा नव्हता. भारत यांची पत्नी नीलाबाई आणि तिचा साथीदार बाबाजी कर्पे यांनी आधीच थंड डोक्याने एक भयंकर कट आखला होता. त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये भारत कर्पे अडथळा ठरत असल्याने, त्यांना कायमचा मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वादाच्या निमित्ताने सुरू झालेल्या बोलाचालीने काही क्षणांतच हिंस्र रूप धारण केले आणि त्यानंतर जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं होतं.
भारत कर्पे यांची पत्नी नीलाबाई आणि तिचा प्रियकर बाबाजी यांनी काठी आणि ठिबकच्या काळ्या पाईपचा वापर करून निर्दयी हल्ला केला. मारहाण इतकी क्रूर होती की, ते पूर्णपणे आसहाय्य झाले. मात्र, इतक्यावरच न थांबता आरोपींनी हाताने गळा दाबून त्यांचा जीव घेतला. आपल्या पतीचा, पोरांच्या बापाचा आणि कुटुंबाचा आधार अशा थरारक पद्धतीने संपवण्यात आला. या संपूर्ण घटनेत क्रूरता आणि नियोजन स्पष्ट दिसून येत होते. हा केवळ त्या रात्री आलेल्या रागाचा उद्रेक नव्हता, तर आधीपासून आखलेला कट होता.
खून केल्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर थांबले नाहीत. उलट, गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी आणखी एक धक्कादायक पाऊल उचलले. मृतदेह घराजवळील खिडकीला ठिबकच्या पाईपच्या साहाय्याने लटकवून गळफास घेतल्याचा बनाव केला. सगळं दृश्य इतकं नीट आखून तयार करण्यात आलं की, पहिल्या नजरेत हा प्रकार आत्महत्याच वाटावा. यामागचा आरोपींचा हेतू स्पष्ट होता, तो म्हणजे पोलिसांची दिशाभूल करून हा खून लपवणे.