Shambhuraj Desai vs Jayant Patil
विटा : "आम्ही बाळासाहेब देसाईंच्या विचारांचे कट्टर वारसदार आहोत, त्यामुळे आमच्यावर टीका करण्यापेक्षा जयंतराव पाटील यांनी आधी स्वतः च्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे," असा इशारा देत शिंदे सेनेचे नेतेआणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विटा येथे शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगली आणि सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर "स्व. बाळासाहेब देसाई यांचे स्वाभिमानी कार्यकर्ते जिल्हा परिषदेची घटना विसरणार नाहीत", असे वक्तव्य केले होते. त्याला मंत्री देसाई यांनी विट्यात हे प्रत्त्युत्तर दिले.
विधान परिषदेच्या मतदानावरून महायुतीचे शक्तीप्रदर्शन
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावर भाष्य करताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेची सर्व मते ही महायुती म्हणून भाजपच्या उमेदवाराच्याच पाठीशी असतील. "मतदान गोपनीय असते, त्यामुळे गैरसमजांना जागा नाही. वरिष्ठांनी सर्व मतभेद मिटवण्याची जबाबदारी घेतल्याने महायुती आता अधिक एकदिलाने काम करत आहे," असे सांगून त्यांनी विरोधकांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला.
'कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल, आता वाद संपुष्टात'
सांगली आणि सातारा जिल्ह्यातील स्थानिक वादांबाबत ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यात हे वाद वैयक्तिक पातळीवर गेले होते. मात्र, मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर महायुतीचे सर्व घटक पक्ष आता एकवटले आहेत. आटपाडीच्या जागेवरून असलेल्या गोंधळावर पडदा टाकत, पक्षादेश पाळून आटपाडीच्या तानाजी पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे स्पष्ट केले. "आता स्थानिक पातळीवरील सर्व गैरसमज दूर झाले असून, आम्ही निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरलो आहोत," असेही त्यांनी अधोरेखित केले.
'महायुतीचे अकराही उमेदवार विजयी होणार'
आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सांगली जिल्ह्याची धुरा आमदार सुहास बाबर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. तसेच, राज्यातील अकराही जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा दावा ही मंत्री देसाई यांनी केला.