Vita city traffic congestion
विटा : ‘नाव मोठं, लक्षण खोटं’ अशी परिस्थिती सध्या विटेकरांच्या अनुभवाला येत आहे. शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग (NH 160) हा प्रत्यक्षात मात्र पूर्वीपेक्षा अरुंद झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘रस्त्यातून राष्ट्रोद्धार’ या संकल्पनेतून NH 160 चे काम सध्या वेगाने सुरू आहे. या उपक्रमाचा उद्देश शहरांमधील अंतर कमी करणे आणि वाहतूक सुलभ करणे हा असला, तरी विटा शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी दिसून येत आहे.
पूर्वी विटा शहरातून राज्य महामार्ग 10 हा दौंड–विटा–सांगली मार्गे जात होता. या राज्य मार्गाची बहुतांश रुंदी सुमारे ७ मीटर (अंदाजे २३ फूट) होती, जी दोन-लेन राज्य महामार्गासाठी Indian Roads Congress (IRC) च्या मानकांनुसार योग्य मानली जाते. शहराच्या मुख्य बाजारपेठ व निवासी भागातून जाताना या रस्त्याची कारेजवे (वाहनांसाठीचा मुख्य मार्ग) व शोल्डर (आणीबाणी किंवा सुरक्षिततेसाठीची बाजूची जागा) मिळून एकूण रुंदी सुमारे १० ते १२ मीटर (सुमारे ३९.५ फूट) होती.
राज्य मार्ग क्रमांक १० चे दर्जोन्नतीकरण करून त्याला राष्ट्रीय महामार्ग १६० असा दर्जा देण्यात आला. हा महामार्ग महाराष्ट्रातील ठाणे ते कर्नाटकातील संकेश्वर अशी महत्त्वाची शहरे जोडतो. मार्गक्रमण करताना तो नाशिक, सिन्नर, शिर्डी, अहिल्यानगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, मायणी, विटा, तासगाव, मिरज, कागवाड, चिकोडी अशा शहरांतून पुढे जातो.
मात्र, विटा शहरात नव्या कामादरम्यान पूर्वीचा रस्ता उकरून गटारांची बांधकामे पूर्वीच्या स्थितीपेक्षा चार ते सहा फूट आत घेतल्याचे दिसते. जुन्या व नव्या गटारांमध्ये चार ते सहा फूट अंतर पडले असून, त्यामुळे प्रत्यक्ष वाहनमार्गाची रुंदी कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
महामार्गाचा दर्जा मिळूनही शहरातील रस्ता प्रत्यक्षात अरुंद झाल्याने ‘महा’मार्गाऐवजी तो ‘लघु’मार्ग झाल्याची टीका होत आहे. यामुळे भविष्यात विटा शहरातील वाहतूक कोंडी अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.